Wednesday, December 27, 2017

माणसं-प्राणीसृष्टी-निसर्ग जोपासूया

नवीन वर्ष यायला आता आणखी तीन दिवस बाकी आहेत. नववर्षाचे संकल्प काय असावेत यावर आपण मागे बोललो होतो त्यातला आणखी एक संकल्प मी आज सुचवतोय. या नवीन वर्षांत आपण माणसं जोडूयात, प्राणीसृष्टी जोपासूयात आणि निसर्ग वाढवूयात.
माणसाची खरी संपत्ती पैसा, जमीन, सोनंनाणं ही नसते. ते मूल्यवान असतातच पण माणसाची खरी संपत्ती त्याच्या आयुष्यात आलेली माणसं असतात. ही संपत्ती कधीच नष्ट होत नाही. माणसं जोडणं हे वाटतं तितकं अवघड काम नाही. पण अनेकांना ते अवघड वाटतं कारण साध्यासोप्या गोष्टी करणं ते टाळतात. ते प्रेम करत नाहीत. ते विश्वास ठेवत नाहीत. ते व्यवहार आणि भावना यांची गल्लत करतात. ते मैत्री निभावत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते माणुसकी पाळत नाहीत. मान्य की आपलं प्रत्येकाशी काही जुळत नाही आणि त्याचा आग्रहही धरण्याची गरज नाही. पण आपण सर्वांशी ओळख तर नक्कीच ठेवू शकतो. इतरांचा सन्मान करा, आदरानं वागा बोला, प्रामाणिक रहा, मदतीला धावून जा, हसून भेटा, या गोष्टी करणं खरंच इतकं कठीण आहे का? मला नाही वाटत तसं. एक साधा नियम आहे की तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला परत मिळतं. तेव्हा काय द्यायचं ते तुम्ही ठरवा.

आपल्या सभोवतालची प्राणीसृष्टी जपण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवेत. पण त्याचबरोबर आपल्यापासून दूर राहणा-या प्राणीसृष्टीबद्दलही मनात प्रेमाची आपुलकीचीच भावना ठेवायला हवी. माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी अन्य प्राण्यांवर अत्याचार केले, करत आहेत, त्याची जमिन माणसानं बळकावली आणि जमेल तिथं हे प्राणी कसे आपल्याला त्रास दायक ठरतात याचा तो कांगावा करत राहतो. पण आपण त्यांच्यावर काय अन्याय करत असतो याचा त्याला सोयिस्कर विसर पडतो. ही प्राणीसृष्टी नष्ट झाली तर काय होईल याचा एकदा नक्की विचार करा. तुम्हाला आधी वाटेल की बरं आहे कटकट मिटली. पण या प्राण्यांमुळेच निसर्गाचं चक्र समतोल राहण्यास मदत होत असते. हे प्राणी नष्ट झाले तर हा समतोलही बिघडेल आणि त्याचे घातक परिणाम दिसतील. आपल्या हातानं आपला हा विनाश ओढवून घेऊ नका.
माणसं आहेत ती निसर्गामुळे. हवा. पाणी. सूर्यप्रकाश. आकाश. वनस्पती. जमिन. हे आपल्या जगण्याचे अत्यावश्यक घटक आहेत. ते प्रदुषित करू नका. त्याचे घातक परिणाम आपल्याला माहितच आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही. फार काही करायचं नाही त्यासाठी. फक्त तुम्ही निश्चय करा की मी माझा निसर्ग नष्ट करणार नाही, प्रदुषित करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. निसर्ग प्रदुषित झाला नष्ट झाला तर माणुसही नष्ट होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

आपल्या नव्या वर्षांचं स्वागत आपण या संकल्पानं करू यात. सो लेट्स डू इट!

No comments:

Post a Comment