सरकारच्या
माहिती व प्रसारण खात्यानं नुकताच एक फतवा काढून टीव्हीवर सकाळी सहा ते रात्री दहा
या वेळेत कंडोम्सच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातली. त्यांचं असं म्हणणं आहे की
यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. आपल्या देशात काही वर्षांपासून संस्काराच्या
नावाखाली जो अतिशयोक्त विनोद सुरू आहे त्यांतला हा आणखी एक ताजा विनोद आहे. पण
त्यावर हसण्याचं धाडस मात्र होत नाही. कारण हा विषय वाटतो तितका गंमतीचा नसून ही
गंमत अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे.
मूळात
सरकारनं लोकांना संस्कार देण्याचं काम करू नये. पालक आणि त्यांची मुलं यांचा हा
खासगी प्रश्न आहे. पण सरकार सध्या सर्वांनाच संस्कारी करण्याच्या मागे लागली आहे.
संस्काराच्या या वावटळीत लैंगिकतेचा कायमच पहिला बळी जात असतो. ज्या शारिरीक
कृतीमुळे आपण अस्तित्त्वात आहोत त्या कृतीबद्दल आपल्या मनात इतकी लाज, संकोच,
भिती, न्यूनगंड जर असेल तर आधी आपण आपली मानसिक तपासनी करून घेणं योग्य राहील. एका
नैसर्गिक आरोग्यदायी घटनेवर या ना त्या कारणानं बंदी टाकून आपण अनेक नव्या
समस्यांना जन्म देत असतो यावर विचार करण्याची गरज आहे.
भारताची
प्रचंड लोकसंख्या हा काही छाती ठोकून अभिमानानं मिरवण्याचा विषय नाही. ती एक
अत्यंत मूलभूत, गंभीर, जीवघेणी नागरी समस्या आहे जिला खरं तर सर्वोच्च प्राधान्य
असायला हवं. पण आपल्या या तथाकथित संस्कारांच्या नावावर तिच्याकडे कायम हेटाळणी,
चेष्टा, आणि आता संस्कार घातकी म्हणून पाहिलं जात आहे. हा निव्वळ बालीशपणा आहे की
कंडोम्सच्या जाहिराती पाहिल्यामुळे मुलांवर कुसंस्कार होतात. याचा स्पष्ट अर्थ असा
होतो की सरकारला माणसाच्या जैविक, शारिरीक, मानसिक, भावनिक अवस्थांविषयी,
वर्तणुकींविषयी काडीचीही माहिती नाही. एरव्ही त्यांनी असली मूर्खपणाची विधानं
केलीं नसती. त्यांच्या या तर्काचा आधार घ्यायचा तर पूर्वी जगात सारं काही सुरळीत
होतं आणि मुलं आभाळातून टपकायची आणि लोक त्यांना घरी घेऊन यायचे असा होईल. मुलांनी
काही पाहिलं नाही तर त्यांच्यात लैंगिक भावना निर्माण होणार नाहीत असा त्यांचा समज
आहे असं जाणवतं. निसर्ग काहीच करत नाही केवळ यांचे संस्कारच सारं काही करतं किंवा
करत नाही अशी यांची खात्री आहे. कोणी किती अतार्कीक वागू शकतो याचं हे उत्तम
उदाहरण सांगता येईल.
आपल्या
देशात लैंगिक शिक्षणाची प्रचंड गरज आहे पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी, कंडोम्सच्या
जाहिरातींवर बंदी घालणं म्हणजे तोंड वेडंवाकडं दिसतं म्हणून जेवणच करायचं नाही असा
काहीसा प्रकार आहे. या जाहिराती पाहून दहा टक्के मुलांनी जरी कंडोम्स वापरले तरी
कुमारी मातांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, सेक्ससाठी कंडोम्स आवश्यक आहे हे
समजलं तर त्यांतून उद्भवणारे अनेक रोग वेळीच रोखले जातील. सरकारला जर अशी भिती
असेल की यामुळे मुलं मुक्तपणे सेक्सकडे वळतील तर त्यानं घाबरण्याची गरज नाही.
मुक्त लैंगिकतेमुळे कोणताही समाज लयास गेला नाही. त्याची कारणं वेगळी असतात. त्यामुळे
अशा भंपक कृती करणं सरकारनं टाळावं हे योग्य.

No comments:
Post a Comment