“मोहम्मद अली पाशा
(थोर) जेव्हा राज्यकारभार बघू लागला तेव्हा सबंध कैरो शहर गलिच्छ उकिरड्यांनी
भरलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने हुकूम काढून प्रत्येक घरमालकाला त्याच्या
त्याच्या घरासमोरच्या रस्त्याच्या स्वच्छतेबद्दल जबाबदार धरावे असे फर्मावले. या
हुकूमाचा भंग करणा-यांच्या घरावर जप्ती आणण्यात येईल ही शिक्षाही हुकूमात होती.
काही जणांना अशा शिक्षा झाल्यानंतर कैरो शहर अगदी लख्ख झाले. आणि त्याचा एक फायदा
म्हणजे त्या शहरी कधीही प्लेगची साथ आलेली नाही. ही टीप मी तांजिए येथून लिहित
आहे. येथे एखाद्या मोहम्मद अली पाशाची फारच गरज आहे.”
अरेबियन
नाईट्स – रिचर्ड बर्टन , अनुवाद गौरी देशपांडे, खंड १२
महान
भटक्या प्रवासी आणि धाडसी संशोधक सर रिचर्ज एफ. बर्टन यांनी लिहिलेली ही टीप आहे
तेराव्या शतकातील एका पाशाच्या काळातली. शेवटास बर्टन जी अपेक्षा करतात ती आपणही
करायला हरकत नाही. मोदींनी नोटाबंदी आणली तशीच कचराबंदी आणली (पण योग्य ती
पूर्वतयारी करूनच) तर तो एक अतिशय चांगला निर्णय ठरेल. फक्त स्वच्छ भारताचं आवाहन
करून आणि साफसफाईची नाटकं करून भारत स्वच्छ होणार नाही. आपल्या देशातले लोक
कमालीचे दांभिक आहेत. वैयक्तिक स्वच्छता पाळण्यात अगदी पवित्रतेचा कळस ते गाठतात
पण सार्वजनिक आयुष्यात याच्या अगदी उलट टोक गाठतात. रस्ता, सार्वजनिक जागा या
आपल्या बापानं आपल्यासाठी वंशपरंपरागत सोडलेल्या मालकीच्या उकिरड्याच्या जागा
असल्यासारख्या सारे त्यांचा कचरा फेकण्यासाठी उपयोग करतात. थुंकण्यासाठी उपयोग
करतात. हगण्यासाठी, मुतण्यासाठी, आणि कुत्रे हगवण्यासाठीही रस्त्यांचा आणि मिळेल
त्या जागेचा उपयोग केला जातो. कोणतीही जागा स्वच्छ राहता कामा नये अशी जणू काही
प्रतिज्ञा घेतल्याप्रमाणे काही लोक आख्खं शहर घाणेरडं करीत हिंडत असतात. या
लोकांना आपल्या कच-याचा मोबदला द्यायची इच्छा नसते. त्यांचा हा कचरा साफ करणा-या
लोकांबद्दल यांच्या मनात आदर नसतो. कोणी त्यांना हटकलं तर ते लगेच मारामारीवर
येतात. रस्ता असो, मैदानं असो, पदपथ असो, सार्वजनिक बागा, इमारती, गच्ची, जिने,
गॅलरी, छतं, आवार, चौक, कुठलीही जागा यांना वर्ज्य नाही. अशा लोकांना आळा घालायचा
असेल तर आता मोहम्मद अली पाशाप्रमाणेच व्यवस्था करायला हवी. ज्यानं त्यानं आपला
परिसर स्वच्छ ठेवायचा, कचरा करायचा नाही, होऊ द्यायचा नाही. त्यात जी मदत लागेल ती
शासकिय संस्थांनी करावी. जे हे करणार नाहीत त्यांच्याकडून जबरी दंड वसूल करण्यात
यावा. आपले लोक इतके निर्लज्ज आहेत की त्यांना फटके आणि तेही सतत, बसल्याशिवाय ते
काही सुधारणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मानसिकतेत बदल होण्याची
गरज आहे. विदेशांत गेल्यावर जे लोक तिथली स्वच्छता पाळतात आणि त्याविषयी इथं
आल्यावर कौतुकानं सांगतात तेच लोक इथं मात्र पुन्हा घाण करण्यात व्यस्त होतात. या
मानसिकतेचं काय करायचं हा प्रश्नच आहे. स्वच्छता हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसतो तर
तो शहर सौंदर्याचाही असतो. त्यावरून इतरांना आपल्या राष्ट्रीय चारित्र्याविषयी
कळतं. शिस्तीविषयी समजतं आणि देशाप्रती आपण किती जबाबदार आहोत हेही दिसतं. पण
आपल्या इथं या सर्वांचा अभाव आहे. शासनानं कचराबंदी लागू करण्याची वाट न बघता आपणच
आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यासाठी खालील गोष्टी
करता येईल. त्यात यश कितपत मिळेल याचा विचार न करता त्याविषयी प्रयत्न सुरू करणं
महत्त्वाचं. आपण आशा करूयात की लोक स्वतःहून या गोष्टीला प्राधान्य देतील. यात
लोकांशिवाय लोक प्रतिनिधींनाही सामावून घेता येतील.
- घरातला कचरा कचराकुंडीतच टाका, सोसायटीच्या
आवारात, आपल्या खाली राहणा-या लोकांच्या घराच्या छतावर टाकू नका.
- शक्य असेल तर सोसायटीत कचरा जिरवण्याचा प्रकल्प
सुरू करा.
- तुम्ही जिथं राहता तिथला रस्ता साफ राहील याची
काळजी घ्या.
- कुत्रे फिरवणा-या लोकांना भेटून त्यांना
त्यांच्या कुत्र्यांना रस्तावर हगवण्यापासून थोपवा.
- दुकानदार, इतर व्यापारी मंडळी यांना भेटून
त्यांना त्यांच्या कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता
कर्मचा-यांना मदत करण्यासाठी आवाहन करा. दुकानाच्या समोर कच-याचे डबे राहतील व ते
कुत्र्यांपासून सुरक्षित राहतील याचीही काळजी घ्या.
- लोक प्रतिनिधींना, स्थानिक नगरसेवकाला भेटून
त्याची काही मदत मिळेल यासाठी प्रयत्न करा.
एकदा सुरूवात करूयात
आणि लोकांना त्याची सवय लागली की हळूहळू बदल नक्कीच घडतो यावर माझा विश्वास आहे.
आपण आपल्यापासून याची सुरूवात करूयात. त्याचे अनुभव इथे तुम्ही शेअर केलेत तर
इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल. सो लेट्स डू इट!