सरकार आता गोरेपणा
वाढवण्याचा दावा करणा-या क्रिम्सवर आणि त्यांच्या जाहिरातींवरही बंदी आणणार आहे
अशी बातमी आहे. तसं झालं तर ती एक महत्त्वाची गोष्ट ठरेल. पण आपल्या वृत्तीतला
गोरेपणा जर गेला नाही तर अशा बंदीला काही अर्थ उरणार नाही. गोरपणाची आपली हाव
संपली नाही तर ही बंदी निरर्थक ठरेल. शरीराचा रंग ही नैसर्गिक गोष्ट असते.
त्यामुळे त्याबाबत लाज वाटण्याचं किंवा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही. पण आपण
सारे मात्र गोरेपणा चांगला आणि काळेपणा वाईट यातच अडकून पडलोय. त्याला अनेक
सांस्कृतिक कारणं आहेत. प्रश्न आहे तो ही घातक प्रवृत्ती बदलण्याचा. तुमचा रंग काय
आहे यापेक्षाही तो कसा आहे याला महत्त्व असायला हवं. त्यामुळे गोरा रंग आहे पण
त्यात तेज नसेल तर माणूस आजारी दिसू शकतो. याउलट काळा रंग असेल पण त्वचा तजेलदार
असेल तर हा रंग खुलून दिसतो. त्यामुळे रंगापेक्षा आपल्या त्वचेवर जास्त लक्ष
देण्याची गरज आहे. आणि कोणतीही रासायनिक घटक असलेली क्रिम ही गोष्ट करू शकत नाही.
त्यामुळं त्वचा कालांतरानं खराबच होते. त्वचेचा रंग नाही तर तिचा पोत
सुधारण्यासाठी, व ती सशक्त आणि निरोगी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ते झाले तर
रंग कोणताही असो तुम्ही सुंदरच दिसता. आणि तुमचा स्वभाव आणि कर्तृत्व यांमुळेही हा
रंग अधिक खुलतो. तेव्हा त्याच्याकडेही लक्ष द्या. हे खरं शाश्वत सौंदर्य आहे ते
मिळवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी क्रिम लावण्याची नाही तर मेहनत करून घाम
गाळण्याची तयारी लागते. ते झालं तर तुमचं सौंदर्य वाढेल यात शंकाच नाही.
No comments:
Post a Comment