Wednesday, September 27, 2017

बेटी पढाओ और फिर उसकी पिटो...

उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात एका मुलीवर मागिल आठवड्यात काही गुंडांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं काही कारवाई करण्याऐवजी त्या मुलींवरच तुम्हीच या प्रकाराला जबाबदार कसे आहात हे सांगितलं. त्यानंतर या मुलींनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांतून आपल्या तथाकथित उच्च संस्कृतीचा बुरखा पुन्हा एकदा फाडला गेला. आपली मनोवृत्ती अजूनही किती कोती आहे, आपला समाज अजूनही किती पुरुषी आहे आणि स्त्रियांबाबत घडलेल्या कोणत्याही अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरच कशी शिताफिनं ढकलण्यात येते हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकीकडे मुलींना शिकवा, वाढवा, त्यांना मोकळं जगू द्या अशा घोषणांचा पाऊस पडतो तर दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली त्यांच्यावर भेदभाव करण्यात येतो. त्यांच्यावर या ना त्या कारणानं वेगवेगळी बंधनं टाकण्यात येतात. काही अनुचित गोष्टी घडल्या तर त्यासाठी पुन्हा त्यांनाच जबाबदार धरण्यात येतं. हे आपण कितीकाळ सहन करणार हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. स्त्रियांच्या सहनशक्तिची परिक्षा बघू नका. त्यांनी जर आपली मर्यादा ओलांडली तर त्यांच्यापुढे सारा समाज वाहून जाईल. आपल्या समाजाची जी काही चांगली सभ्यता, संस्कृती, परंपरा आहे ती टिकवण्यात या स्त्रियांचाच मोठा सहभाग आहे. पण त्यांनाच त्यांचा सर्वांत मोठा फटका बसत आला आहे. त्यामुळे स्त्रियांनी जर हे सभ्यता-संस्कृतीचं जोखड फेकून दिलं तर सारा समाजच रसातळाला जाईल. ही वेळ त्यांच्यावर येणार नाही यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. स्वातंत्र्य हे विनाशर्त द्यायला हवं. जबाबदारीचं भान ठेवणं योग्यच आहे पण त्यासाठी आपणही आपली जबाबदारी पूर्ण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान ठेवण्याची. त्यांना स्वातंत्र्य देऊन आपण त्यांच्यावर नाही तर स्वतःवर उपकार करत आहोत हे लक्षात ठेवा. कारण स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व हे पुरुषालाही सहाय्यक ठरतं. तिचं सक्षम असणं म्हणजे समाजाची शक्ति वाढणं. याचा विसर पडू देऊ नका. 

Monday, September 18, 2017

चला आनंद वाटूया...

लोकांना आनंद देण्याचे अनेक प्रकार आहेत. पण एक वाचक आणि लेखक म्हणून मला इतरांना आनंदी करण्याचा मार्ग त्यांच्याशी पुस्तकांबदद्ल बोलणं हा वाटतो. मी ज्यांना भेटतो त्यांना मी वाचलेल्या पुस्तकांची माहिती देतो, त्यांनी काय वाचन केलं ते जाणून घेतो, माझ्या लिखाणाची चर्चा करतो, त्यांच्याकडून त्यावर मतं मागवतो. माझ्यासाठी पुस्तकांसंबंधीचं कसलंही बोलणं आनंदाचं असतं. दुर्देव्यावं आपल्याकडे हा आनंद देणारे आणि घेणारे यांची संख्या फारच कमी आहे. वाचनाची अभिरूची असणं हे मानवतेचंही एक दृष्य लक्षण असतं. ते केवळ मनोरंजन नाही तर माणूस घडवण्याचं माध्यम आहे त्यामुळे वाचन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असायलाच हवा. त्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न आपण करायलाच हवेत.
हाच उद्देश मनात घेऊन पुण्यात काही उत्साही लोकांनी बिईंग फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली आहे. लोकांना पुस्तकं वाटून त्यांना आनंदी करायचं हा त्यामागचा उद्देश. आणि आनंदी करण्यासाठी लहान मुलांइतकं पात्र कोण असणार बरं? त्यामुळे लहान मुलांना आनंदी करण्याचा वसा या लोकांनी उचलला आहे. पुस्तकं देऊन या मुलांच्या चेह-यावर हसू फुलवण्याचं काम ही मंडळी करत आहे. त्यासाठी त्यांनी वन बुक वन स्माईल नावाची मस्त योजना सुरू केली आहे. यात तुम्ही काय करायचं तर तुमच्या जवळचे इकडे तिकडे उगाच खर्च होणारे जे पैसे आहेत त्यांतले फक्त थोडेच (तुम्ही जास्तही देऊ शकता – त्यावर काही बंधन नाही J)  तुम्ही या मंडळींना द्यायचे. त्यांतून काही सुंदर पुस्तकं विकत घेऊन ते काही गरजू मुलांना देतील. त्यांची तुम्हाला भेटही घडवून आणतील. तुम्हाला पुस्तकं द्यायची असतील तर तुम्ही पुस्तकंही देऊ शकता. मी खाली संस्थेची माहिती दिली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तिथं जाऊन हे आनंदाचं काम नक्की करावं.
Being Foundation
A-3/4, Nimbaj Nagar, Nr. Nirmal Township,
Sinhagad Road, Pune, Maharshtra. India
Reg. No.: Maha./377/2016/PUNE
Account Name: Being Foundation
Account Number: 60246701066
Bank: Bank of Maharashtra
Branch: Pimplesaudagar (1443)
IFSC Code: MAHB0001443
MICR Code: 411014110
CREATE A SMILE: +919075091815  Pune 411027. (Maharashtra)

IMP Note: Once you gift the amount through net banking it is kind request to all of you to
please share your details on below email ID. Name, PAN, Mobile, NEFT Details.


1book1smile@gmail.com

Thursday, September 14, 2017

कृतिशील श्राद्धाची गरज

सध्या सगळीकडे श्राद्धाची धुमशान सुरू आहे. त्यामुळे कावळ्यांना आणि स्मशान पंडितांना चांगले दिवस आले आहेत. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी एकीकडे निसर्गाची हानी करायची, कावळ्यांची घरटी असणारी झाडं तोडून टाकायचीं आणि मग वर्षातले काही दिवस याच कावळ्यांनी पिंडाला शिवायचं म्हणून त्याची वाट बघायची हा निव्वळ निर्लज्जपणा आहे. माणूस मेला की संपतो व त्याच्या आठवणी तेवढ्या मागे राहतात. त्याची आठवण टिकवून ठेवण्याच्या अनेक विधायक गोष्टी करता येत असताना असले काही उद्योग करायचे आणि वर स्वतःला विज्ञानवादी, सुशिक्षित, सुसंस्कृत समजायचं हा दुटप्पीपणा आपल्या लोकांना फार चांगला जमतो. त्यांना कितीही सांगितलं तरी ते सुधारणार नाहीत पण तरीही त्यांना सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून सांगतो. गेलेल्या माणसाची स्मृती टिकवून ठेवणं, त्याच्या चांगल्या कृत्याची आठवण ठेवणं, त्याच्याप्रती कृतज्ञता बाळगणं हा श्राद्धामागचा एक हेतू आहे. त्यासाठी आपण काळानुरूप काही चांगले बदल केले तर त्याचा खरंच समाजाला उपयोग होईल, तुम्हाला समाधान लाभेल आणि गेलेल्या माणसाचं नाव चांगल्या गोष्टीसाठी टिकून राहील.


श्राद्धाच्या निमित्तानं कोणाला पुजा करायची असलीच तर जरूर करा पण त्यासोबत मृताच्या नावानं काही चांगला उपक्रम राबवलात तर त्याला अधिक चांगला अर्थ लाभेल आणि ख-या अर्थानं त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. मृताच्या नावानं झाडं लावली किंवा ज्या संस्था झाडं लावतात त्यांना आर्थिक मदत केली तर तुम्हाला निसर्ग वाढवण्याचं पुण्य मिळेल. मृताच्या नावानं गरजू मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा. त्यामुळे कोणा पात्र माणसाला मदत केल्याचं पुण्य लाभेल. मृताच्या नावानं काही सामाजिक संस्थांना तुम्ही शक्य असेल तितकी आर्थिक मदत करू शकता. त्यामुळे मृताचं नाव टिकून राहिल. आपल्या श्रद्धांना आधुनिकतेची जोड दिली आणि काळानुरूप योग्य ते बदल केलेत तर परंपराही टिकून राहते आणि कर्मकांडांतलं थोतांडही दूर होण्यास मदत होते. सो लेट्स डू इट!