माझ्या
सर्व वाचकांना वर्ष २०१८ च्या आभाळभर शुभेच्छा!
काळ
आपण बांधून ठेवू शकत नाही. काळाचे असे दिवस, महिना, वर्षांचे तुकडे माणसानं आपल्या
सोयीसाठी पाडलेले आहेत. त्यांतून माणसाचा हिशेबीपणा दिसतो. पण त्याचबरोबर आपण किती
जगतो हेही कळतं. याच किती जगण्यात आपण कसं जगतो यालाही महत्त्व आहे. खरंतर सर्वांत
जास्त महत्त्व त्यालाच आहे. त्यामुळे मागील वर्षभरांत आपण कसे जगलो याची स्वतःशीच
उजळणी करत यावर्षी आपण कसे जगणार आहोत याचा विचार करायचा आहे.
आपण
हे वर्ष मानसिक आनंदाला देऊ या. आपल्या रोजच्या आयुष्यातील धावपळीनं आपल्या शरीरावर
जितका ताण पडतोय त्याहीपेक्षा जास्त ताण आपल्या मनावर पडत असतो. आणि मनाचं
स्वास्थ्य जर उत्तम नसेल तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. शरीर स्वस्थ नसेल तर मन
आनंदी राहणार नाही. हे एक दुष्ट चक्र आहे. त्याचा भेद करायचा असेल तर मनावरचा हा
ताण काढणं शिकायला हवं.
मानसिक
ताण केवळ विचारांनी घालवता येऊ शकत नाही. त्यासाठी काही कृती आवश्यक असते. कृतीमुळे
आपलं मन गुंतून राहतं आणि नको त्या गोष्टींचा विचार बाजूला पडतो. शरीर कामात
गुंतून राहीलं की नको ते विचार करायला वेळ भेटत नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांना
पुरक ठरतात आणि मनावरचा अनावश्यक आणि आरोग्यास अपायकारक ताण दूर होण्यास मदत होते.
यावर्षी
निराशेला मनात भाडेकरू म्हणून ठेवू नका. आनंदाला ठेवा. तो तुम्हाला दररोज आनंदाचं
भाडं देईल. आनंद असेल तर उत्साह येतो. उत्साह असेल तर मनात सकारात्मक विचार येतात.
सकारात्मक विचार प्रयत्न करण्यासाठी आपल्याला प्रेरीत करतात. प्रयत्न असतील तर यशाची
शक्यता निर्माण होते. जिथं शक्यता आहे तिथं जगण्यास वाव असतो. निराश मनानं
शक्यतेपर्यंतचा प्रवास घडू शकत नाही. आनंदी मनच तुम्हाला या शक्यतेपर्यंत घेऊन जातं.
फार
काही करण्याची गरज नाही. मनात निराशा असेल तेव्हा तुमच्या आवडीचं काम करा. थोडे
स्वार्थी व्हा. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टी करा. तग धरून
राहा. परिस्थिती बदलत असते. संधीची वाट बघत राहा. कधीतरी ती मिळेल तेव्हा
तिच्यासाठी आजच तयार राहा. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी याचा विचार करा की
तुमच्या जाण्यानं जगाचं नुकसान होणार नाही, तुमचं होईल. पण तुमच्या असण्यानं
तुमच्यासोबतच कदाचित जगाचंही भलं होण्याची शक्यता आहे. हे जग तुमच्या अवती भवतीच
असतं. त्यातला कोणताही कोपरा निवडा आणि ते जग बदलण्यास सुरूवात करा. करण्यासारख्या
खूप गोष्टी आहेत. गरज आहे ती चिकाटीची. धैर्याची. सहनशक्तिची. इन्स्टंट असं जगात
काहीच मिळत नाही. इन्स्टंट कॉफीलाही काही वेळ लागतो तयार होण्यासाठी. जगणं तर फार
कसोशिनं घडवावं लागतं. पण त्याचे फायदेही तुम्हालाच मिळत असतात.
तेव्हा
हे नव वर्ष तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगा. निराशेला, हताशेला,
नकारात्मक विचारांना गुडबाय करा आणि उत्साहाला, आनंदाला, सकारात्मकतेला घट्टी मिठी
मारा. लेट्स डू इट!




