Wednesday, December 20, 2017

कापडी पिशव्या आणि पर्यावरण रक्षण

एका साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी आपण आज बोलूयात. पर्यावरण हा आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अत्यावश्यक असा महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय माणूस आणि अन्य कोणतीही सजीव सृष्टी जगूच शकणार नाही. पण असं दिसतंय की या पर्यावरणाचं नुकसान करण्यांत आपण खूपच आघाडी घेतली आहे. आपण त्यात आता इतके अनुभवी झालो आहोत की या गोष्टींचं आपल्याला आता काही वाटेनासं झालंय. कित्येकदा कळत आणि बहुतेकदा नकळतच आपण या गोष्टी करतो. त्यामुळे आपण पर्यावरणाची हानी करतोय ही जाणीवही आपल्याला होत नाही. ही यातली सर्वांत भयानक गोष्ट आहे. जर आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय ही जाणीवच आपल्याला होत नसेल तर मग आपण पर्यावरणाचं रक्षण करण्याचं मनात आणणार तरी कसं?

ही जाणीव मग पर्यावरणच आपल्याला करून देते. मुंबईत नुकताच मुसळधार पाऊस झाला होता. ज्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं. हे सारं पाणी जे समुद्रात जाणं अपेक्षीत होतं तसं मात्र ते गेलं नाही. कारण ज्या गटारींतून ते पाणी वाहणं अपेक्षित होत्या त्या तुंबल्या होत्या. त्या तुंबल्या होत्या त्यांत साठलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे. प्लास्टिक सडत नाही त्यामुळे ते नाश पावत नाही. त्यामुळे ते जिथं कुठे असेल तिथं केवळ नुकसान करण्यापलीकडे काहीच करत नाही. ते उकीरड्यावर राहीलं तर गाई-म्हशी-शेळ्या ते प्लास्टिक खातात आणि त्याचे गोळे त्यांच्या पोटात साठत राहतात. प्लास्टिक गटारात गेलं की पाणी अडून राहतं. ते समुद्रात गेलं की मासे त्यात अडकून राहतात. जेव्हा वादळं येतात तेव्हा समुद्रातला हा प्लास्टिक कचरा पुन्हा आपल्याकडेच फेकला जातो. जमिनीत प्लास्टिक मुरलं की जमिनीचा कस निघून जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाचं केवळ आणि केवळ नुकसानच होतं आणि वर्षानुवर्षँ ते तसंच होत राहतं कारण ते सडत नाही. कारण आपण प्लास्टिक पिशव्या वापरत राहतो म्हणून.
पर्यावरण रक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे आपण सामान्य गोष्टीच करायच्या आहेत. मोठ्या गोष्टी आपण सरकार आणि निसर्ग यांच्यावर सोपवूयात. आपण काय करू शकतो –
१-       आजपासून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या वापरणं पूर्णपणे बंद करू शकतो. त्याऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापरू शकतो.
२-       प्लास्टिकचा कचरा कमीतकमी होईल याची काळजी घेऊ शकतो.
३-       प्लास्टिकच्या पिशव्या आपण गटारं, समुद्र, नद्या, तळी, विहीरीत टाकण्यापासून स्वतःला आणि इतरांना थांबवू शकतो.

सुरूवात म्हणून आपण या तीन साध्या गोष्टी करू शकतो. तेवढं केलं तरी विश्वास ठेवा की आपण पर्यावरण रक्षणात एक मोठी मजल मारू शकतो. तेव्हा लेट्स डू इट!

No comments:

Post a Comment