Thursday, September 14, 2017
कृतिशील श्राद्धाची गरज
सध्या सगळीकडे श्राद्धाची धुमशान सुरू आहे. त्यामुळे
कावळ्यांना आणि स्मशान पंडितांना चांगले दिवस आले आहेत. कोणी काय करावं हा ज्याचा
त्याचा प्रश्न असला तरी एकीकडे निसर्गाची हानी करायची, कावळ्यांची घरटी असणारी
झाडं तोडून टाकायचीं आणि मग वर्षातले काही दिवस याच कावळ्यांनी पिंडाला शिवायचं
म्हणून त्याची वाट बघायची हा निव्वळ निर्लज्जपणा आहे. माणूस मेला की संपतो व त्याच्या
आठवणी तेवढ्या मागे राहतात. त्याची आठवण टिकवून ठेवण्याच्या अनेक विधायक गोष्टी
करता येत असताना असले काही उद्योग करायचे आणि वर स्वतःला विज्ञानवादी, सुशिक्षित,
सुसंस्कृत समजायचं हा दुटप्पीपणा आपल्या लोकांना फार चांगला जमतो. त्यांना कितीही
सांगितलं तरी ते सुधारणार नाहीत पण तरीही त्यांना सांगितल्याशिवाय राहवत नाही
म्हणून सांगतो. गेलेल्या माणसाची स्मृती टिकवून ठेवणं, त्याच्या चांगल्या कृत्याची
आठवण ठेवणं, त्याच्याप्रती कृतज्ञता बाळगणं हा श्राद्धामागचा एक हेतू आहे.
त्यासाठी आपण काळानुरूप काही चांगले बदल केले तर त्याचा खरंच समाजाला उपयोग होईल,
तुम्हाला समाधान लाभेल आणि गेलेल्या माणसाचं नाव चांगल्या गोष्टीसाठी टिकून राहील.
श्राद्धाच्या निमित्तानं कोणाला पुजा करायची असलीच तर जरूर
करा पण त्यासोबत मृताच्या नावानं काही चांगला उपक्रम राबवलात तर त्याला अधिक
चांगला अर्थ लाभेल आणि ख-या अर्थानं त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. मृताच्या नावानं
झाडं लावली किंवा ज्या संस्था झाडं लावतात त्यांना आर्थिक मदत केली तर तुम्हाला
निसर्ग वाढवण्याचं पुण्य मिळेल. मृताच्या नावानं गरजू मुलामुलींना शिक्षणासाठी मदत
करा. त्यामुळे कोणा पात्र माणसाला मदत केल्याचं पुण्य लाभेल. मृताच्या नावानं काही
सामाजिक संस्थांना तुम्ही शक्य असेल तितकी आर्थिक मदत करू शकता. त्यामुळे मृताचं
नाव टिकून राहिल. आपल्या श्रद्धांना आधुनिकतेची जोड दिली आणि काळानुरूप योग्य ते
बदल केलेत तर परंपराही टिकून राहते आणि कर्मकांडांतलं थोतांडही दूर होण्यास मदत
होते. सो लेट्स डू इट!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment