Thursday, May 25, 2017

आपण देशासाठी कधी व काय करणार?

देश सरकार चालवत असलं तरी त्याला सर्वसामान्य लोकांचा जोवर पाठींबा मिळत नाही तोवर सरकारी निर्णयांचे हवे ते योग्य परीणाम होणं अश्यकच असतं. सरकार जे निर्णय घेतं त्याची योग्य ती कारणमीमांसा करून एकाचवेळी जरूर तिथे विरोध व जरूर तिथे पाठींबा देत या निर्णयांचा आदर व त्यावरची कृती करणं हे नागरीकांचंही कर्तव्य असतं. त्याशिवाय देश मोठा होत नाही. नागरीकशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याकडे अत्यंत दूर्लक्षित विषय आहे. त्यामुळे सामान्य व्यवहारात लोकांनी कसं वागायचं याचे कोणतेच धडे आपण गिरवत नाही. त्यापायी होणारे परीणाम आपण दररोज बघत असतो. आपल्याला साधी रांगेची शिस्त पाळता येत नाही, वाहतुकीचे नियम पाळता येत नाही, अपघातात आपण लोकांची मदत करत नाही, ही फक्त काही उदाहरणं आहेत. ही नेहमीची व वरकरणी छोटी व अर्थहीन उदाहरणं वाटली तरी या गोष्टी दररोज होत असतात त्यामुळे त्यांचा एकत्रित परीणाम हा प्रचंड असतो तरीही आपण त्याकडे दूर्लक्ष करतो.
नागरीक जर आपलं कर्तव्य विसरले तर देश कधीच मोठा होत नाही. आपल्या देशानं हे कायमच अनुभवलं आहे आणि तरीही आपण त्यातून काहीच शिकत नाही. कोणताही निर्णय झाला की त्याला आपल्या फुटकळ स्वार्थासाठी विरोध करणं हेच आपण करतो. आपण केवळ बालिश बडबडी करण्यात धन्यवाद मानतो व व्यवहारात फक्त कृतीशून्य आहोत.
मोदी सरकारनं गेल्या काही वर्षांत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
पहिला स्वच्छ भारताचा व दुसरा काळे धन रोखण्यासाठी जुन्या पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा. त्यावर आपली कशी प्रतिक्रिया आहे ते आपल्या रोगट भारतीय मानसिकतेचं लक्षणीय उदाहरण आहे. आधी सर्वांनी याचं स्वागत केलं. जे मोदी भक्त आहेत त्यांनी त्यांच्या अंध भक्तीत व जे मोदी विरोधक होते त्यांनी नाईलाजानं. नंतर काही दिवसांनी हे दोन्ही निर्णय कसे चुकीचे आहेत यावर मोदी विरोधकांनी मोठमोठे लेख लिहायला सुरूवात केली. प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत पण ते विचारण्याआधी आपण या निर्णयाबरहुकुम वागतोय का, आपण स्वतः यासाठी काय केलं होतं, पुढे काय करणार आहोत का हेही पहायला हवं. पण ते क्वचितच होताना दिसतं.
आणि मग येतं सामान्य जनतेचं वागणं ज्यांच्यामुळे हा देश बनला आहे. सरकार निर्णय घेईलच पण लोकांनीच त्याची अंमलबजावनी केली नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. स्वच्छ भारताची मोहिम चालवावी लागते हीच मूळात आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. बरं ती केल्यानंतर तरी तिला पाठींबा द्यायचा व आपलं वागणं सुधारायचं तर तेही नाही. कारण ती आपली मानसिकताच नाही, आपण फक्त बोलतो पण करत काही नाही. नोटा रद्द करण्याच्या गोष्टीलाही आपण असाच प्रतिसाद देत आहोत. एका चांगल्या निर्णयाचं स्वागत करण्याऐवजी त्यांतील पळवाटा दाखवणं, चुका शोधणं यावरच मोदी विरोधकांचा भर आहे. तर सामान्य जनता जणू काही आभाळ कोसळलं आहे अशा पद्धतीनं वागत आहे. वर्तमानपत्रांतून, टीव्हीवरून वारंवार सांगूनही लोक मुर्खासारखे बँक पोस्टात गर्दी करत आहेत. सोन्याची किंमत वाढल्याच्या बातम्या येत आहेत आणि लोक दुप्पट पैसा मोजून सोनं विकत घेण्याच्या बातम्याही. का घेत आहेत हे लोक सोनं? प्रामाणिकपणे कर भरून बँकेत का जमा करत नाही हा पैसा? मग इथे चुक कोणाची आहे? व्यापारी लुट करत आहे सामान्य जनता भरडली जात आहे, अरे पण तुमची काही जबाबदारी नाही का? याचा अर्थ तुम्ही स्वतःही भ्रष्टाचारच करत आहात. तुम्ही काही विजय मल्यापेक्षा कमी भ्रष्टाचारी नाही आणि भ्रष्टाचार हा शंभर रुपयाचा असो की हजार कोटींचा असो भ्रष्टाचारच असतो.
देशासाठी लोक काय करतात हा प्रश्न इथे आहे. आपण सारेच देशभक्तिच्या गप्पा मारतो. पण देशात सुरक्षित असताना अशा गप्पा मारायला काही लागत नाही. आज थोडी पैशांची अडचण होत आहे तर सारे हवालदील झाले आहेत. हीच आहे का आपली देशभक्ति? आपण काही दिवस थोडा त्रासही सोसू शकत नाही का? सीमेवर सैनिक आणि हजारो लोक रोज मरणाच्या छायेत जगत असतात आणि आपण काही दिवसांसाठीही अडचणी सहन करू शकत नाही. आणि हा काही मोदी भक्त असण्याचा, मोदी विरोधक असण्याचा मुद्दा नाही, हा निखळ तुम्ही या देशाचे जबाबदार नागरीक आहात की नाही आणि त्यानुसार तुम्ही वागणार की नाही याचा प्रश्न आहे. दूर्दैव्यानं ते होताना दिसत नाही. देशात सध्या अंध मोदी भक्तांची जशी गर्दी वाढली आहे तशीच अंध मोदी विरोधकांची गर्दीही वाढली आहे. या दोन्ही प्रवृत्ती आपल्यासाठी देशासाठी घातक आहेत.

मोदी आज आहेत उद्या नसतील. त्यांच्या जागी आणखी कोणीतरी येईल. पण आपण सामान्य जनता कायमच असणार आहो. प्रश्न हा आहे की आपण कधी आपली वागणूक सुधारणार आहोत की नाही याचा. शेवटी ज्याची जशी लायकी असते तेच त्याला मिळतं. आपणच जर भिकारचोट असू तर आपल्याला नेतेही तसेच मिळणार आणि कोणी काही चांगले निर्णय घेतलेच तर त्याचीही आपण मातीच करणार. मग तो कोणताही नेता असो वा कोणतंही सरकार असो. देश एका निर्णयानं मोठा होत नाही. देश एका रात्रीतून मोठा होत नाही आणि देश केवळ सत्ताधारी नेत्यांमुळे मोठा होत नाही. तो सामान्य नागरीकांच्या दररोजच्या शेकडो लहान सहान गोष्टींनी मोठा होत असतो. पण गेली कित्येक वर्षं ती जबाबदारी आपण विसरलो आहोत. जोवर आपण ते करणार नाही तोवर हा देश मोठा होणार नाही.

No comments:

Post a Comment